

बेळगाव : भाजपची सत्ता असतानाच देशावर दहशतवाद्यांनी हल्ले केले आहेत. भाजप आणि आयएसआयचे काहीतरी संबंध असल्यामुळेच हे हल्ले होत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केला. काँग्रेसच्या संविधान मेळाव्यासाठी सोमवारी (दि. 28) बेळगावात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर काश्मिरमधील कारागृहात असलेल्या मौलाना मसूदला अफगाणिस्तानात सोडून देण्यात आले. त्यानंतर संसदेवर हल्ला झाला. पठाणकोटमधील हवाईतळावर झालेल्या हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले. अमरनाथ यात्रेकरुंवर तसेच नगरोटा येथे जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. पुढे पुलवामा हल्ला झाला. आता पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. भाजप सत्तेत असतानाच असे हल्ले का होतात याचे उत्तर भाजपच्या नेत्यांनी द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.
भाजपच्या अनेक नेत्यांचे आयएसआय या संघटनेची संबंध असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर त्यांनी कडाडून टीका केली. बजरंग दलासह भाजपच्या काही नेत्यांचे आयएसआयसी संबंध असल्याचे याआधी उघडकीस आले होते. देशावर जे काही हल्ले होत आहेत ते केवळ सरकारच्या अपयशातून होत आहेत.
गुप्तचर यंत्रणा कुचकामी ठरली आहे. पहलगाम हल्ला झाल्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकारला संपूर्ण पाठिंबा देऊन दहशतवाद्यांचा खात्मा करा, असे सांगितले आहे. बैसरन मैदानाबाबत गृहमंत्री शहा यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप करत देशावर झालेल्या हल्ल्याबाबत भाजपच्या नेत्यांनी खुलासा करावा अशी मागणी सुरजेवाला यांनी केली.
यावेळी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्यासह काँग्रेस नेते उपस्थित होते.
आम्ही लोकशाही मार्गाने केंद्र सरकारमुळे वाढलेल्या महागाई विरोधात तसेच संविधान बचावासाठी संपूर्ण राज्यभरात मेळावे आयोजित करत आहोत. मात्र, बेळगावात भाजपच्या काही मूठभर महिला कार्यकर्त्यांनी मेळाव्याच्या ठिकाणी येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार चुकीचा आहे. यापुढे कुणीही अशी आगळीक केली तर जशास तसे उत्तर देऊन भाजपला एकही सभा घेऊ देणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिला.
ते म्हणाले, केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढविले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. याचबरोबर संविधानही धोक्यात आले आहे. त्यामुळे, आम्ही मेळावे घेऊन जनतेला जागरुक करत आहे. मात्र, अशा प्रकारे जर कुणी आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही गप्प बसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.