बंगळूर : ‘गरिबी हटाओ’चा नारा देऊन काँग्रेसने 75 वर्षे सत्ता मिळवली. पण, केवळ काँग्रेस नेत्यांची गरिबी हटू शकली. त्यांनी 75 वर्षांत जे केले नाही ते केंद्रातील मोदी सरकारने करून दाखवल्याचे भूपृष्ठ वाहतूक आणि रस्ते निर्माण मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
गुरुवारी (दि. 4) येथे आयोजित भाजप कार्यकारिणीच्या समारोपावेळी ते बोलत होते. काँग्रेसने आतापर्यंत केवळ घोषणाबाजीच केली आहे. काम काहीच केले नाही. युवकांनी इतिहास जाणून घ्यावा. इतिहास विसरू नये. जगाच्या नकाशात आज भारताने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. काँग्रेसला जे 75 वर्षांत जमले नाही ते मोदी सरकारने केवळ दहा वर्षांत करून दाखवले आहे. या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे आता उत्पन्न दुप्पट झाले आहे. रोजगार निर्माण होत आहे. ऑटोमेशनमध्ये भारताने जपानला मागे टाकून तिसरे स्थान मिळवले आहे. आगामी पाच वर्षांत या क्षेत्रात देश पहिल्या क्रमांकावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इलेक्ट्रिक मर्सिडीज कार उत्पादन आपल्या देशातच होणार आहे. हायड्रोजन, इथेनॉलवर चालणारी वाहने सध्या रस्त्यावर धावत आहेत. संपूर्ण देशात आता इलेक्ट्रिक वाहने फिरतील. डिझेल बसपेक्षा 30 टक्के कमी किमतीत सेवा देणारी इलेक्ट्रिक कार तयार होत असल्याची माहिती त्यांनी दिली.