

निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाट येथे हॉटेल गोवावेस उतारावर दोन कारचा अपघात झाल्याने कोल्हापूर येथील पाचजण जखमी झाले. हा अपघात रविवारी सायंकाळी झाला. दरम्यान अपघातग्रस्त दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले.
लक्ष्मीनगर टेंबलाईवाडी नाका, कोल्हापूर येथील महादेव नलवडे हे आपल्या कुटुंबीय व नातेवाईकांसह कारने बेळगाव येथे काही कामानिमित्त गेले. तेथील काम आटोपून ते कोल्हापूरकडे परतत होते. त्यांची कार तवंदी घाटात रस्ता उतारावर आली असता मागून भरधाव येणाऱ्या कारचालकाचा ताबा सुटल्याने या कारची नलवडे यांच्या कारला जोरात धडक बसली. यामध्ये महादेव नलवडे (वय 83) मंगल महादेव नलवडे (वय 75) शिवतेज चेतन नलवडे (वय 10) शिवानी प्रवीण सूर्यवंशी (वय 28) दीपाली प्रवीण सूर्यवंशी (वय 51) हे जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापुरे यांनी कंपनीच्या ॲम्बुलन्ससह घटनास्थळी धाव घेत जखमींना येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी संकेश्वर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.