

बेळगाव ः लग्नाला तीन वर्षे झाली तरी मूल होत नाही म्हणून पत्नीकडून होत असलेल्या हिनवणीला कंटाळून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. बैलहोंगल तालुक्यातील नेगिनहाळमध्ये बुधवारी (दि. 21) सकाळी ही घटना उघडकीस आली. राजेश्वरी फकीराप्पा गिलकण्णावर (वय 21, रा. नेगिनहाळ, ता. बैलहोंगल) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती फकीराप्पा बसाप्पा गिलकण्णावर (वय 28, रा. नेगिनहाळ) याला बैलहोंगल पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत बैलहोंगल पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, राजेश्वरी व फकीराप्पा यांच्या लग्नाला तीन वर्षे झाली आहे. तीन वर्षे होऊनही मूल होत नाही, असे म्हणत राजेश्वरी सातत्याने फकीराप्पाशी भांडण काढत होती. राजेश्वरीच्या भाच्याच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे, तिने माहेरी जाण्याचा तगादा पतीकडे लावला होता. आता जाऊ नकोस, शेतात कामे आहेत, नंतर जाऊन ये, असे फकीराप्पाने तिला सांगितले होते. मंगळवारी (दि. 20) रात्री राजेश्वरीने पुन्हा पतीशी भांडण सुरु केले. यावेळी पुन्हा ती तीन वर्षे झाली तरी मूल होत नाही, असे म्हणत भांडू लागली. पत्नीकडून मुलासाठी सततचा त्रास सुरु असल्याने फकीराप्पाने ती खाटेवर झोपल्यानंतर दोरीने गळा आवळून तिचा खून केला. घटनेची माहिती होताच बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पतीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.