

बेळगाव : येळ्ळूर मंडळ पंचायतीचे माजी प्रधान, म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते तसेच माजी तालुका व जिल्हा पंचायत सदस्य अर्जुन नागोजी गोरल (वय ७८) यांचे गुरूवारी (दि. २१) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुल, सुना, नातवंडे आहे. शुक्रवारी (दि. २२) सकाळी १० वाजता मंगाईनगरमधील त्यांच्या पोल्ट्री फार्मजवळ अंत्यसंस्कार होणार आहेत.
अर्जुन गोरल म. ए. समितीचे निष्ठावंत, प्रामाणिक आणि पुरोगामी विचारांचे खंदे कार्यकर्ते म्हणून परिचित होते. ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायतीच्या त्यांनी येळ्ळूरच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. सीमाप्रश्न आणि मराठी भाषेच्या संरक्षणासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य झोकून दिले होते. ‘येळ्ळूर महाराष्ट्र राज्य’फलकाच्या जतनासाठी त्यांनी कायम भूमिका घेतली. फलक हटविल्यानंतर झालेल्या पोलिसांच्या लाठी हल्ल्यावेळी त्यांनी ग्रामस्थांसमवेत संघर्ष केला. या घटनेत ते जखमी झाले होते.
शेती आणि भात व्यवसायातही त्यांनी उल्लेखनीय काम केले. गावातील सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. मोठा मित्रपरिवार आणि सर्वसामान्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ही त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने येळ्ळूरसह संपूर्ण सीमाभागाने एक लढवय्या, अभ्यासू आणि तळागाळातील नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.