

बंगळूर : विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून जाणाऱ्या आमदारांच्या निवडणुकीत काँग्रेसने विरोधकांना जबरदस्त ठोसा लगावताना पाचवी जागाही जिंकली आहे. एकूण सातपैकी पाच जागा काँग्रेसने जिंकल्या असून, दोन जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. निजदचा एकमेव उमेदवार पराभूत झाला. भाजप-निजदच्या आमदारांनी आपल्याच उमेदवारांना मतदान केले असते, तर निजदचा उमेदवारही निवडून आला असता. मात्र एकूण भाजपच्या तीन आणि निजद सात अशा एकूम १० आमदारांनी काँग्रेसला मतदान केल्यामुळे काँग्रेसची एक वाढीव जागा निवडून आली, तर निजदला पराभव पत्करावा लागला.
काँग्रेसचे पाचवे उमेदवार असलेले विनय कार्तिक यांना सर्वाधिक ३२ मते मिळाली. केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद, टी. कामकानोरू यांना प्रत्येकी ३० आणि मळवळ्ळी शिवण्णा व पी. व्ही. मोहन यांना प्रत्येकी २९ मते मिळाली आहेत. भाजप उमेदवार रघु कौटिल्य यांना २९ आणि लिंगराजू पाटील यांना २७ मते मिळाली आहेत. निजद उमेदवार गोविंदराजू यांना केवळ यांना केवळ १४ मते मिळाली. त्यामुळे ते पराभूत झाले. विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान २८ मते आवश्यक होती.
काँग्रेसचे विधानसभेत १३६ आमदार आहेत. या संख्येनुसार त्यांचे चारच उमेदवार निवडून आले असते. मात्र भाजप आणि निजदची १४ मते फुटून ती काँग्रेसला मिळाली. त्यामुळे काँग्रेसचे पाचवे उमेदवार कार्तिक हेही निवडून आले. पाचही काँग्रेस उमेदरांना मिळून एकूण १५० मते मिळाली आहेत. त्यात काँग्रेसच्या १३६ आमदारांची १३६ आणि भाजप-निजदची १४ मते आहेत. विधानसौधमधील मतदान केंद्रावर निजदचे ज्येष्ठ आमदार जी. टी. देवेगौडा यांनी सर्वप्रथम मतदान केले. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार बसवराज रायरेड्डी यांनी सर्वात शेवटी मतदान केले. दुपारी 4 पर्यंत एकूण २२२ आमदारांनी मतदान केले. त्यामुळे १०० टक्के मतदान झाले.
मतमोजणी
सायंकाळी ५ वाजता तिन्ही पक्षांच्या निवडणूक प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली. सर्व २२२ मतपत्रिका तपासल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी एक मतपत्रिका अवैध ठरवून २२१ मतांची मोजणी सुरू केली. त्यामुळे विधानसभेतील पक्षांच्या संख्याबळाच्या गणनेनुसार प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी किमान २८ मतांची आवश्यकता होती. त्यानुसार काँग्रेस चार, तर भाजप दोन जागा जिंकण्याची शक्यता होतीच.
विधानसभेत एकूण १८ आमदार असलेल्या निजदला भाजप, अपक्ष आणि काँग्रेसच्या अतिरिक्त आमदाराची मते मिळाली तरच जिंकण्याची संधी होती. ती साधण्याच्या आशेने निजदने गोविंदराजू यांना रिंगणात उतरवले होते. मात्र मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी अपक्ष व भाजपमधून बाहेर पडलेल्या आमदारांच्या पाठिंब्याच्या अपेक्षाने विनय कार्तिक यांना पाचवे उमेदवार म्हणून उभे केले आणि निजदच्या रणनीतीला खीळ बसवली.