

बंगळूर : शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारच्या कामगार व प्रशासकीय सुधारणा विभागाने एक नवीन प्रणाली तयार केली आहे. त्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांनी रोज सकाळी १० पर्यंत कार्यालयात हजेरी लावणे बंधनकारक केले आहे. यासाठी राज्याच्या ई-गव्हर्नन्स विभागाने 'कर्तव्य' नावाचे एक नवीन ॲप विकसित केले आहे. यामध्ये जिओ-टॅगिंग प्रणाली असून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी ते डाउनलोड करून नोंदणी करणे आवश्यक आहे.
या प्रणालीमध्ये कर्मचारी कार्यालयात पोचताच हजेरी नोंदवू शकतात. ही प्रणाली भू-निर्देशांक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कर्मचारी नेमून दिलेल्या कार्यालयीन ठिकाणी आहेत की नाही याची खात्री देखील करणार आहे.
सदर प्रणाली सुरुवातीला आरोग्य विभागात प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आली होती. तेथील चांगल्या परिणामांनंतर त्या प्रणालीचा राज्यातील सर्व शासकीय विभागांमध्ये विस्तार करण्यात आला आहे.