

बंगळूर : महिनाभरा पासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर होण्याची चिन्हे आहेत. रिक्त २० पदांपैकी १८ पदे भरण्याचा निर्णय झाला असून, त्या यादीसह मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार गुरुवारी दिल्लीला मंजुरीसाठी जात आहेत. त्यामुळे इच्छुकांनी तीव्र लॉबिंग सुरू केले असून, प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि खुद्द शिवकुमार यांच्या निवासस्थानी आमदारांची गर्दी होत आहे. तीनपेक्षा जास्त वेळा विधानसभेवर निवडून आलेल्या मात्र आतापर्यंत संधी न मिळालेल्यांना संधी देण्याचा निर्णयसुद्धा झाला असल्याचे कळते. ११ जुलै रोजी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी दिल्लीला परतणार आहेत. त्यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्तारासाठी परवानगी मागण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. या भेटीत १८ जणांची नावे निश्र्चित होण्याची शक्यता आहे. दोन मंत्रिपदे रिक्त ठेवली जातील. ती तिसऱ्या टप्प्यात भरली जाणार आहेत.
३ जून रोजी मुख्यमंत्री शिवकुमार यांनी १३ मंत्र्यांसह शपथ घेतली होती. विधानसभेच्या एकूण २२४ जागांच्या १५ टक्के म्हणजेच जास्तीत जास्त ३४ जण मंत्री बनू शकतात. १४ पदे आधीच भरली गेली आहेत. त्यामुळे २० पदे रिक्त आहेत. दरम्यान, विस्ताराचे संकेत मिळताच माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या भेटीसाठी झुंबड उडाली आहे. उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर, माजी मंत्री एच. सी. महादेवप्पा, दिनेश गुंडूराव, मधू बंगारप्पा, चेलुवरायस्वामी, आमदार शिवलिंगेगौडा, प्रदीप ईश्वर, श्रीनिवास माने यांच्यासह अनेकांनी त्यांच्याशी विस्तारावर चर्चा केली. मंत्रिमंडळ विस्तारात अनुभवाला प्राधान्य देण्यात यावे, वंचितांना संधी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सिद्धरामय्यांकडे केली आहे.
दुसरीकडे माजी मंत्री एच. के. पाटील, आमदार जी. टी. पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांची भेट घेऊन चर्चा केली. तर काही आमदारांनी मुख्यमंत्री शिवकुमार यांची भेट घेऊन मंत्रिमंडळात स्थान देण्याची विनंती केली आहे. गुरुवारी रात्री दिल्लीला निघालेले मुख्यमंत्री आधी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व राज्य काँग्रेस प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला यांची भेट घेतील. शुक्रवारी रात्री ते राष्ट्रीय चिटणीस के. सी. वेणूगोपाल व राहुल गांधी यांचीही भेट घेणार आहेत.