बंगळूर : राज्य मंत्रिमंडळातील एक रिक्त जागा भरणे, एका महिलेला संधी देणे आणि दोन मंत्र्यांना डच्चू देऊन ज्येष्ठ नेत्यांना संधी देणे, अशा मंत्रिमंडळ फेरबदलावर विधानसभेचे आगामी अधिवेशन संपल्यानंतर निर्णय घेण्यात यावा, असा सल्ला हायकमांडने मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना सोमवारी दिला. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदल तूर्त लांबणीवर पडला आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्टपासून सुरू होत आहे.
नव्या मंत्र्यांना खातेवाटप व नाराज ज्येष्ठ आमदारांना मंत्रिपदे देऊन त्यांचे समाधान करण्याकरिता वरिष्ठांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत दाखल झालेल्या शिवकुमारांनी रविवारी रात्री एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. तर सोमवारी सकाळी पक्षाचे संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली. विद्यमान मंत्रिमंडळातील एक-दोन सदस्यांना वगळून ज्येष्ठ नेत्यांना संधी देऊन असंतोष शमवण्यासाठी शिवकुमारांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. याला खर्गे व वेणुगोपाल यांनी सहमती दर्शवली असली तरी ही प्रक्रिया विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर राबविण्यात यावी, असे त्यांनी सुचवले आहे. शिवाय ३ जूनरोजी झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी काही मंत्र्यांना देण्यात आलेल्या खातेवाटपावरून निर्माण झालेल्या वादावरही सर्वांना विश्वासात घेऊन पुढे जाण्याचा सल्ला दिला आहे. शिवकुमार म्हणाले, वरिष्ठांशी अनेक विषयांवर चर्चा केली आहे. मंत्र्यांना खातेवाटपाची प्रक्रिया अधिवेशनादरम्यान पूर्ण होईल.
आरोप कुणावर नाहीत!
देशात कोणावर केस नाही? कितीतरी लोक जामिनावर सुटून सध्या मंत्री आहेत? असे प्रश्न उपस्थित करत मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षांना मुख्यमंत्री शिवकुमार यांनी उत्तर दिले आहे. देशात असे कोण आहेत ज्यांच्यावर खटले नाहीत? एच. डी. कुमारस्वामी यांना जामीन मिळाला नाही का? नागेंद्र कर्नाटक सोडून जात असल्याचे माझ्या निदर्शनास आलेले नाही. कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाल्याचा कोणताही आदेश न्यायालयाने दिलेला नाही. जे काही आहे ते कायदेशीर चौकटीत आहे. विरोधी पक्षांना चर्चेसाठी मुद्द्यांची गरज आहे, म्हणून ते बोलत असून त्यांना बोलू द्या, असेही शिवकुमार म्हणाले.
‘जेडीएस’वर टीका
‘जेडीएस’च्या बिदडी टाऊनशिपविरोधी संघर्षाबद्दल बोलताना शिवकुमार म्हणाले, राजकारणाच्या अस्तित्वासाठी लढत आहेत. नाईस व बिदडी या दोन्ही प्रकल्पांवर कोणी स्वाक्षरी केली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनीच बनवलेली योजनाच आम्ही पुढे चालू ठेवली आहे.