

Jotiba Chaitra Yatra
निपाणी: सलग आठव्या वर्षी सौंदलगा येथील भक्तांची जोतिबा डोंगर येथील चैत्र यात्रेसाठी पायी वारी मंगळवारी सकाळी रवाना झाली. विशेष म्हणजे यावेळच्या पायी वारीमध्ये सात ते दहा वर्षाच्या मुलांचा समावेश आहे. गेल्या आठ वर्षापासून सौंदलगा येथील शेतकरी, व्यापारी, कामगार, नोकरवर्गातील भावीक एकत्रित येऊन दरवर्षी ज्योतिबा डोंगर येथे भरणाऱ्या चैत्र यात्रेसाठी जातात.
पहिल्या वर्षी या वारीमध्ये पाच भाविकांचा समावेश होता. त्यानंतर दरवर्षी भाविकांची संख्या वाढत गेली. यंदा वारीत सहभागी झालेल्या ५० भाविकांनी ग्रामदैवत श्री नरसिंह मंदिरात येऊन श्री चे दर्शन आणि आरती करून डोंगराकडे रवाना झाली.
भक्ती व श्रद्धेतून सर्व घटकातील भाविकांनी गेल्या आठ वर्षांपासून पायी वारीची परंपरा जोपासली आहे. यंदाच्या या पायीवारीमध्ये सुरेश पाटील, सुनील पाटील, उत्तम पाटील, उदय पाटील, नारायण पाटील ,पंडित पाटील, नांगनुरे, एकनाथ पाटील, युवराज पाटील, नंदकुमार पाटील, जयसिंग पाटील, मारुती पाटील, पांडुरंग जनवाडे, धोंडीराम चिखले यांच्यासह पाच ते दहा वर्षाच्या बालकांचा सहभाग होता.
या पायी वारीचा मंगळवारी डोंगर पायथ्याशी असलेल्या गायमुख परिसरात मुक्काम झाल्यानंतर बुधवारी साजऱ्या होणाऱ्या मुख्य यात्रेत सहभागी होऊन भावीक रात्री मूळ गावी परतणार आहेत. सौंदलगा ते जोतिबा डोंगर व डोंगर ते पायथा असे मिळून एकूण ७५ किलोमीटरचे अंतर आहे. भक्तीभावाने गेल्या आठ वर्षांपासून ही पायी वारीची परंपरा अखंड सुरू असल्याचे, सुनिल पाटील या भक्ताने 'दै. पुढारी'शी बोलताना सांगितले.