

जमखंडी : प्रेमीयुगुलाने तासाभराच्या अंतराने जीवन संपवल्याची घटना बुधवारी (दि. 8) सकाळी बागलकोट जिल्ह्यातील रबकवी-बनहट्टी तालुक्यात घडली. कार्तिक चन्नप्पा नायक (वय 20) व पवित्रा राजशेखर वंटी (वय 19) असे युगुलाचे नाव आहे.
आसंगीतील महाविद्यालयीन युवक कार्तिक व बनहट्टीतील केएचडीसी कॉलनीतील रहिवासी पवित्रा यांचे एकमेकांवर प्रेम होते. पवित्रा ही रबकवीतील एका खासगी टेक्स्टाईल दुकानात काम करत होती. मंगळवारी सायंकाळी कार्तिक पवित्राच्या घरी गेला होता. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाल्याने कार्तिकच्या घरच्यांनी येऊन वाद मिटवला होता. त्यानंतर त्यांच्यात तडजोड झाली होती. पवित्राने बनहट्टीतील राहत्या घरी बुधवारी सकाळी सुमारे 7.30 च्या सुमारास स्वयंपाक घरात गळफास घेऊन जीवन संपवले.
त्यानंतर सुमारे तासाभराने 8.30 वाजण्याच्या सुमारास कार्तिकनेही आसंगीजवळील सरस्वती मळ्याजवळील एका झाडाला गळफास लावून जीवन संपवले. प्रेमीयुगुलाने जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे. बनहट्टी ठाण्याचे उपनिरीक्षक संजय दरिगोंड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सुरू आहे.