निपाणी; पुढारी वृत्तसेवा : मोबाईलवरील इमेज बघितल्याच्या रागातून दोन शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये वाद होऊन खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. साकिब समीर पठाण (वय १४) (रा.जुने संभाजीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. निपाणी पोलिसांनी या प्रकरणाचा १२ तासात तपास केला आहे. जुबेर सलीम एकसंबे (वय २१, रा.जुने संभाजीनगर) यासह आणखी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जुने संभाजीनगर येथील अल्पवयीन शाळकरी विद्यार्थी साकीब पठाण हा गुरूवारी (दि. २१) रात्री ७ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरातून बाहेर पडला. दरम्यान, तो बराच उशीर घराकडे परतला नाही. त्यामुळे त्याचा घरच्यांनी इतरत्र शोध सुरु केला. शुक्रवारी (दि. २०) सकाळी साकीब याचा बाळूमामानगर येथील रहिवासी चोपडे यांच्या घरात रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह शेजारील नागरीकांना आढळून आला. त्यानुसार याची माहिती कुटुंबियांसह पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी साकीबच्या आई-वडीलासह उपाधीक्षक (डीएसपी) गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी.एस. तळवार, उपनिरीक्षिका उमादेवी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत खून झालेल्या विद्यार्थ्याची ओळख पटविली.
शुक्रवारी (दि. २०) रात्री साकीब घरातून बाहेर गेल्यानंतर मित्रांसोबत असणारी उठबस, परिसरातील मोबाईल लोकेशन या आधारे पोलीसानी तात्काळ त्याच्या ५ संशयित मित्रांना ताब्यात घेतले. यावेळी संशयित जुबेर याने आपल्या अल्पवयीन मित्राने आपला मोबाईल काहीकाळ साकीबला हाताळण्यासाठी दिला होता. यावेळी साकीबने मोबाईल हाताळल्यानंतर दोघामध्ये बाचाबाची झाली. त्यातून वाद वाढत गेल्याने साकीबच्या डोक्यात अल्पवयीन मित्राने पेव्हर ब्लॉक डोक्यात घातला. यामध्ये साकीब गंभीर जखमी होवून रक्ताच्या थारोळ्यात तिथेच पडला. यावेळी संशयीत दोघांनी तेथून पळ काढला.
पोलिसांनी या प्रकरणात ५ संशयीतांना ताब्यात घेतले. घरातील मंडळींच्याकडून कसून चौकशी केली. मयताची आई सिमरन यांनी या प्रकरणाची फिर्याद दिली. १२ तासाच्या अथक प्रयत्नानंतर पोलीसांना दोघा मित्रांनीच खून केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार संशयीत दोघांवर खूनाचा गुन्हा नोंद करून शनिवारी (दि. २१) सायंकाळी दोघा संशयितांना बेळगावच्या विशेष न्यायालयासमोर हजर केले असता, एकाची हिंडलगा कारागृहात तर, अल्पवयीन याची बालसुधारगृहात रवानगी केल्याची माहिती निपाणी पोलीसांनी दिली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांसह हवालदार शेखर असोदे, सुदर्शन असकी, यासीन कलावंत, एम.ए.तेरदाळ, उमेश माळगे, सलीम मुल्ला, एम.ए. घस्ती, मंजुनाथ कल्याणी यांनी केला.