

निपाणी : हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना हा शेतकरी सभासदांच्या मालकीचा आहे. कारखान्याचे विस्तारीकरण झाल्यामुळे दैनंदिन १० हजार टन गाळप होणार आहे. कारखान्याने दैनंदिन २ लाख लिटर इथेनॉल निर्मिती घटकाचे विस्तारीकरण केले आहे. शिवाय विविध धान्यापासून इथेनॉल निर्मिती करण्याचा प्रकल्पही सुरू केला आहे.
बाजारपेठेत साखरेचे दर वाढले तर शेतकरी सभासदांना ज्यादा ऊस बिल देता येणे शक्य असल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक माजी खासदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी सांगितले. कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन जयकुमार खोत होते. स्वागत संचालक श्रीकांत बने यांनी केले. चेअरमन जयकुमार खोत यांनी अहवाल वाचन केले.
जोल्ले म्हणाले, यावर्षी ऑक्टोबर महिन्यात कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होणार आहे. भागातील ऊस तोडणी कामगारांकडून तोडणी व्यवस्था करण्यात आली आहे. कारखाना परिसरात अनेक विकासकामे राबवली आहेत. सभासदांच्या मुलांना स्कॉलरशीप दिली आहे. कारखाना तोट्यात असला तरी सभासदांना कमी दराने साखर दिली जात आहे. सभासद व कामगारांचा विमा उतरवला आहे. जोल्ले ग्रुपने गेल्या २३ वर्षात विविध सामाजिक कार्य केली आहेत.
आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या, सहकार तत्वावरील हालसिद्धनाथ साखर कारखाना गेल्या ३८ वर्षापासून निपाणी परिसरातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्याचे काम करीत आहे. या कारखान्याची स्थापना संस्थापकाने दूरदृष्टी ठेवून केली आहे. शेतकरी व कामगारांना न्याय देण्याचे काम केले आहे. हा कारखाना डबघाईला आला असताना त्याला आर्थिक पाठबळ देऊन शेतकरी व कामगारांचे हित जोपासले आहे. विविध पिकापासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे. आमदार म्हणून मतदारसंघात प्रामाणिक विकासकामे केली आहेत. कारखान्यात तसेच बिरेश्वर संस्थेमध्ये भागातील युवकांना रोजगार दिला आहे.
कारखान्याचे कार्यकारी संचालक अप्पासाहेब शिरगावे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले तसेच सभासदांनी लेखी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. सभेत मयत सभासदांच्या वारसांना विमा धनादेशाचे वितरण व सभासदांच्या मुलांना स्कॉलरशीपचे वितरण करण्यात आले. सभेला व्हा. चेअरमन गीता पाटील, संचालक आप्पासाहेब जोल्ले, विश्वनाथ कमते, अविनाश पाटील, रामगोंडा पाटील, समित सासणे, पवन पाटील, प्रकाश शिंदे, जयवंत भाटले, रमेश पाटील, रावसाहेब फराळे, शरद जंगटे, सुहास घुगे, विनायक पाटील, वैशाली निकाडे, राजेंद्र शाह, महालिंग कोठीवाले, आर. एल. चौगुले, आनंद यादव, भरत नसलापुरे, देवाप्पा देवकाते आदी उपस्थित होते.