

बेळगाव : दिवसेंदिवस उन्हाळा तीव्र होत चालल्याने गावागावांतून पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. याचा फटका मानवाप्रमाणेच प्रामुख्याने जनावरांना बसत आहे. गायी, म्हशी, बैल, बकरी आदी जनावरांना वाढत्या उष्म्यापासून धोका निर्माण होत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
बेळगाव जिल्ह्यात सुमारे 28 लाख जनावरे आहेत. यामध्ये बकरी, मेंढी यांचाही समावेश आहे. धनगरांकडून प्रामुख्याने बकरी, शेळी, मेंढी यांचे पालन केले जाते. त्यांना प्रामुख्याने पाण्याचा फटका बसत आहे. चारा मिळवितानाही कसरत करावी लागत आहे. बहुतेक तलाव, नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे, पाणी मिळविताना कसरत करावी लागत आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने जनावरे आजारी पडत आहेत. त्याचबरोबर जनावरे मरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
बेळगाव जिल्ह्यात बेळगाव, चिकोडी, बैलहोंगल उपविभागातील अनेक गावांतून पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी चारा, पाणी उपलब्ध आहे. तेथील शेतकरी अडचणीत नाहीत. परंतु, पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या भागात शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. पाण्याच्या समस्येबरोबरच जनावरांमध्ये लाळखुरकत, लम्पीसारख््या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे पशुवैद्यकीय खात्यातर्फे खबरदारी घेण्यात येत आहे.