

बंगळूर : राज्य सरकारचा अभिमान असलेल्या 'गृहलक्ष्मी' व 'गृहज्योती' या हमी योजना कोणत्याही कारणास्तव थांबविल्या जाणार नाहीत. याबाबत विरोधी पक्षांकडून पसरविल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांवर जनतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले आहे. ते रविवारी (दि. १४) बंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, काहीजण हयात नसलेल्या व्यक्तींच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून खाती उघडून योजनेचा गैरफायदा घेत असल्याचे कळते आहे. त्यामुळे हमी योजनेच्या लाभार्थ्यांच्या पडताळणी-साठी दुसरा अर्ज सादर करण्यास सांगितले आहे. सर्व हमी योजना १०० टक्के सुरूच राहणार आहेत. त्यामुळे जनतेने कोणतीही काळजी करण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हमी योजनांतील लाभार्थ्यांच्या संख्येत सुधारणा करण्याच्या सरकारच्या निर्णयाला भाजपने विरोध केला आहे. हमी लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी केली आहे. हमी योजनांमुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून, सरकारी तिजोरीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता सरकार कारणे देत असून, लाभार्थ्यांची संख्या लाखोंनी कमी करण्याचा डाव आखला जात आहे.
योजनांचा लाभ पात्र व्यक्तींनाच दिला पाहिजे यात शंका नाही. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून सत्तेत असलेल्या सरकारने हमी देताना पात्रता व अपात्रतेचा विचार केला नाही का? असा सवाल त्यांनी केला.