

बेळगाव : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने शहरात हॉटेल व्यावसायिक व खानावळींचे गणित कोलमडले आहे. मोजकेच पदार्थ करुन व्यवसाय जगवण्यासाठी धडपड सुरु आहे. शहरातील नामांकीत दोन हॉटेल्स बंद ठेवण्यात आली आहेत.
घरगुती गॅस पुरवठा सुरळीत असला तरी व्यावसायिक गॅस सिलिंडर पुरवठा ठप्प झाला आहे. त्यात टप्याटप्याने सुधारणा होत आहे. तोपर्यंत व्यवसाय जगवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांसह खानावळ, टपरी चालकांनी लाकडाचा पर्याय स्वीकारला आहे. शहरातील दोन नामवंत हॉटेल बंद ठेवण्यात आली आहेत. मोठ्या हॉटेल्सना सिलिंडरची झळ बसत असताना यात लहान व्यावसायिकांनाही अडचणीचा सामना करावा लागत आहे. जी हॉटेल्स सुरु आहेत, त्यामध्ये मोजकेच खाद्यपदार्थ बनवले जात आहेत.
जळाऊ लाकूड दहा रुपये किलो तर कोळसा 50 रुपये किलो दराने विकला जात आहे. लाकूड व कोळशाच्या दरात वाढ झाली नाही. गॅस तुटवड्यामुळे हॉटेल, खानावळी आणि घरगुती चुलींचा वापर वाढल्याने लाकडाचा व्यापार दहा टक्याने वाढला आहे. लाकडाच्या मागणीत अचानक वाढ होत गेल्यास जंगलतोडीची भीती व्यक्त केली जात आहे. गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे खाद्यपदार्थ महाग झाले आहेत. या परिस्थितीत प्रशासनासमोर पर्यावरणाचे संरक्षण आणि गॅस पुरवठा सुरळीत करणे ही दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.