

खानापूर : नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या पोलिस कारवाईचा निषेध करत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव तथा माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात केलेली कारवाई ही ‘लोकशाहीची क्रूर थट्टा’ असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. निंबाळकर म्हणाल्या की, नीट पेपरफुटीमुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आपल्या भवितव्याच्या रक्षणासाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन छेडले होते. मात्र, पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेला लाठीमार हा अत्यंत अमानुष असून यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे, असे त्यांनी सांगितले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना न्याय मिळावा आणि त्यांचे प्रश्न संसदेत मांडले जावेत, या उद्देशाने पंतप्रधान कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन केले. हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी होते.
मात्र, विद्यार्थ्यांवरील कारवाईनंतर खासदार गांधी आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांविरोधातही पोलिसांकडून केलेली कारवाई लोकशाही मूल्यांना तडा देणारी आहे. लोकशाहीत आंदोलनांना दडपण्याचा प्रयत्न योग्य नाही. विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही डॉ. निंबाळकर यांनी केली.