

बंगळूर : राज्यातील काँग्रेसमध्ये पुन्हा नेतृत्वबदलाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. राज्यातील पोटनिवडणुका व केरळ, तामिळनाडू येथील विधानसभा निवडणुका पार पडल्याने तातडीने दिल्ली दौरा करणारे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावर पक्षश्रेष्ठींसमोर आपली भूमिका स्पष्ट करत दबाव टाकत असल्याचे कळते.
शिवकुमार हे तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सक्रिय सहभाग घेईन मतदान संपताच दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी एआयसीसी नेत्या प्रियांका गांधी, मुकुल वासनिक, सचिन पायलट, रणदीप सूरजेवाला, जयराम रमेश, जितेंद्र सिंह यांच्यासह अनेकांची भेट घेतली आहे. शिवाय के. सी. वेणूगोपाल व राहुल गांधी यांना भेटण्याच्या प्रयत्नात असल्याचे कळते.
नेतृत्वबदलाबाबत हायकमांड स्पष्ट सूचना देईपर्यंत दिल्लीतून परत येणार नसल्याचे शिवकुमार यांनी म्हटल्याचे समजते. दिल्लीत भेटलेल्या नेत्यांसमोरही त्यांनी हेच मत व्यक्त केले असल्याचे कळते आहे. राज्य सरकारला आता सत्तेत तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे हायकंमाडने निर्णय जाहीर करावा, असा आग्रह केला असल्याचे कळते.
दुसरीकडे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीयही सिद्धरामय्याांनी घेतलेल्या तटस्थ भूमिकेबद्दल नाराज आहेत. सिध्दरामय्यांनी आपली भूमिका बदलून सर्व मुद्द्यांवर सक्रिय होऊन पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानी आयोजित स्नेहभोजनावेळी उपस्थित असलेले मंत्री सतीश जारकीहोळी, डॉ. जी. परमेश्वर, दिनेश गुंडूराव व के. एन. राजण्णा यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या भूमिकेवर आक्षेप घेत काही मुद्द्यांवर पक्ष व सरकारने गप्प राहणे योग्य नाही, असे म्हटले होते.