

बेळगाव : राज्यात २०२८ मध्ये पुन्हा काँग्रेस सरकार पूर्ण बहुमताने सत्तेवर येईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केला आहे. बेळगाव जिल्हा काँग्रेस भवनात गुरुवारी (दि. ९) आयोजित सत्कार समारंभात बोलताना त्यांनी भाजपच्या राजकारणावर टीका करत सरकारच्या आगामी योजनांची माहिती दिली.
मुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, मंत्री सतीश जारकिहोळी आणि माझ्या नेतृत्वाखाली २०२८ मध्ये राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल. भाजप सरकारने केवळ भावनांचे राजकारण केले तर आम्ही जनतेच्या उदरनिर्वाहाचे राजकारण केले आहे. भाजप सरकारने घरोघरी वाटलेल्या अक्षता अयोध्येहून आलेल्या नसून, आमच्या अन्नभाग्य योजनेच्या तांदळाला हळद-कुंकू लावून वाटण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
मी स्वतःला मुख्यमंत्री न मानता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो. काँग्रेस पक्षाने नेहमीच प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान दिला आहे. कार्यकर्त्यांना सत्तेत वाटा देण्यासाठी प्रत्येक ग्राम पंचायत पातळीवर सहा सदस्यांची हमी समिती स्थापन केली जात असून त्यात प्रत्येक समाज आणि महिलांना प्रतिनिधित्व दिले जात आहे. यंदापासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका पुन्हा सुरु करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्री शिवकुमार यांनी बेळगाव जिल्हा काँग्रेस कार्यालयाला भेट दिली. यावेळी मंत्री सतीश जारकिहोळी यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास होईल आणि काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यात येईल, असे जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
आमदार राजू सेट यांनी कार्यकर्त्यांना मतदार यादी पडताळणी करुन पात्र मतदारांचे अर्ज बीएलओकडे जमा करण्याचे आवाहन केले. सरकारच्या पाच हमी योजना यशस्वीपणे लोकांपर्यंत पोचत असल्याचे सांगत त्यांनी आगामी निवडणुकीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे व मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार विश्वास वैद्य, महांतेश कौजलगी, नागराज यादव, चन्नराज हट्टीहोळी, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित होते.