

बेळगाव ः महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर 21 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीपूर्वी महाराष्ट्र शासनाने तयारी म्हणून वकिलांची बैठक घ्यावी, तसेच उच्चाधिकार समितीची तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी सीमा प्रश्नासाठी नियुक्त तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्र शासनाने खटल्याच्या सुनावणीची पूर्वतयारी करणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये वरिष्ठ वकिलांच्या बैठका, साक्षीदारांची शपथपत्रे आणि खटल्याबाबतची रणनीती ठरवणे गरजेचे असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. 21 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी ही सीमा प्रश्नाच्या मूळ दाव्यावर होणार असल्याने तिला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे उच्चाधिकार समितीची बैठक तातडीने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीने खासदार धैर्यशील माने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून 21 जानेवारीपूर्वी उच्चाधिकार समितीची बैठक घ्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता खासदार माने यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून ही मागणी पुन्हा मांडली आहे.