

बेळगाव : काही दिवसांपूर्वी ईडी छाप्यांमागे कोण आहे, याचे नाव माहीत असल्याचे सांगणाऱ्या सतीश जारकिहोळी यांनी बुधवारी (दि. १६) घूमजाव केले. ईडी छाप्याला कारणीभूत ठरलेली तक्रार नेमकी कुणी दाखल केली, याबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. योग्य कागदपत्रांशिवाय कुणावरही आरोप करता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
सुवर्णसौधमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, आवश्यक कागदपत्रे आणि माहिती तपासल्यानंतरच ईडीच्या छाप्याशी संबंधित मुद्यांवर भाष्य करेन. दलित समाजातील नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न होत असल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. आगामी काळात परिस्थितीचे निरीक्षण केले जाईल. ईडी छाप्याला कारणीभूत ठरलेली तक्रार नेमकी कुणी दाखल केली, याबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.
एनओसी नसतानाही व्हॅक्सिन डेपोत कामे करण्यात येत आहे, याला तत्कालीन प्रशासन जबाबदार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या निधीतून १५६ एकर जागेवर परदेशी शैलीतील डिझाइनचा वापर करुन प्रकल्प उभारण्यात आला होता. मात्र, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले ना-हरकत प्रमाणपत्र घेतले होते की नाही, याची कोणतीही योग्य नोंद उपलब्ध नाही. प्रकल्प उभारणीसाठी सुमारे ३०० कोटी रुपये खर्च आले होते. त्यामुळे या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी एका आयोगाची नियुक्ती करण्यात आली असून लोकायुक्तांकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
आरोग्य विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या व्हॅक्सिन डेपोत कोणाच्या सुचनेवरुन कामे करण्यात आली. याची कोणतीही स्पष्ट नोंद उपलब्ध नाही. आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र न घेता हे काम केल्यास, त्यावेळी कार्यरत असलेले प्रशासन, राजकारणी आणि आमदार यांना जबाबदार धरले जाईल. व्हॅक्सिन डेपो महापालिकेकडे सोपवायचा की त्याच्या देखभालीची जबाबदारी कोणाकडे द्यायची, याबाबत चर्चा सुरु आहे. या विषयाबाबत यापूर्वीच आक्षेप नोंदवण्यात आले होते, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.