

बेळगाव ः पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ जमीनदोस्त केले. त्यामुळे, भारत व पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भूदल व हवाई दलाचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगाव शहरात खबरदारीचे उपाय हाती घेण्यात आले आहेत. प्रादेशिक सेनेच्या महार बटालियनचे मुख्यालय असलेल्या भुईकोट किल्ल्यामध्ये सर्वसामान्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. किल्ल्यात राहणार्या रहिवाशांना सायंकाळी सातच्या आत किल्ल्यात येण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.
भारतीय संरक्षण दलाने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानसह पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले. या घटनेनंतर देशभरात विशेषता संरक्षण दलाच्या विविध विभागांमध्ये ‘अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. बेळगाव शहर परिसरात असलेल्या संरक्षण दलाच्या विविध कार्यालयांमध्येही खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत.
भुईकोट किल्ल्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना बुधवारपासून प्रवेशबंदी करण्यात आली आहे. किल्ल्यामध्ये ज्यांची घरे आहेत किंवा तेथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात कामानिमित्त ये-जा करणार्या लोकांना ओळखपत्र तपासून किल्ल्यात प्रवेश दिला जात आहे.
किल्ल्यात घरे असलेल्या रहिवाशांनी स्वतःजवळ आधार कार्ड बाळगणे आवश्यक आहे. सायंकाळी सातच्या आत त्यांना भुईकोट किल्ल्यात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानंतर येणार्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. किल्ला परिसरात सशस्त्र बंदोबस्त ठेवण्यात आला असून कॅम्पमधील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या परिसरात सध्या हातात रायफली घेतलेल्या सशस्त्र जवानांची गस्त सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.