

बेळगाव : पाणी पुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या जलाशयांची पाणीपातळी कमालीची घटल्याने शहरावरील पाणीटंचाईचे सावट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. त्यातच शहरातील कूपनलिका व विहिरीही तळ गाठू लागल्याने टंचाईत भर पडत आहे. शहरात आठ दिवसांआड होणारा पाणीपुरवठा दहा दिवसांनीही झाला नसल्याने टँकरना मागणी वाढली आहे. त्यामुळे महापालिकेने २५ टँकर सज्ज ठेवले असून, सध्या १५ टँकरद्वारे टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा केला जात आहे.
शहरात टंचाईच्या काळात ७४५ कूपनलिका आणि ६८ उघड्या विहिरी दैनंदिन वापरासाठी पाणीपुरवठ्याचे काम करत होत्या. मात्र, जून महिना निम्मा उलटला तरी पावसाने दडी मारल्याने यातील बहुतांश कूपनलिका व विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे शहरातील पाणीटंचाई हळूहळू तीव्र स्वरूप धारण करत आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यात कमाल ६० टक्के कपात करण्यात आली आहे. परंतु, टंचाईग्रस्त भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची सज्जता महापालिकेने केली आहे. त्यासाठी २५ टँकरची सोय केली असून, सध्या १५ टँकर कार्यरत आहेत. टँकरची जबाबदारी नगरसेवकांवर सोपविण्यात आली आहे. नगरसेवकांनी टंचाईग्रस्त भागाची माहिती दिल्यानंतर तिथे टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा राकसकोप व हिडकल जलाशयांमध्ये कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे आधी चार दिवसांआड होणारा पाणीपुरवठा आठ दिवसांवर येऊन ठेपला होता. आता मे, जून महिना कोरडा गेल्याने पाणीपुरवठा बारा दिवसांआड होऊ लागला आहे. त्यामुळे ग्राहकांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत आहेत. त्यासाठीच टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. राकसकोप जलाशयाची पाणीपातळी शुक्रवारी (दि. १९) २,४४८.३० फूट होती. सध्या जलाशयात दोन अश्वशक्तीच्या मोटारी सोडून पाणी खेचण्याची तयारी करण्यात आली आहे. पाणीसाठा २,४४८ फुटांवर पोहोचल्यास मृत साठ्यातून पाणी उपसा सुरू केला जाणार आहे.