

बेळगाव : आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये टाळ वाजवत असताना वारकरी महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना कुप्पटगिरी (ता. खानापूर) येथे बुधवारी (दि. १७) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. यल्लू उर्फ बायजा यशवंत पाटील (वय ७२) असे या वारकरी महिलेचे नाव आहे.
गावातील वारकरी मंडळाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दुपारी १ वाजता दिंडी सुरू करण्यात आली होती. या दिंडीमध्ये यल्लू पाटील या सहभागी झाल्या. यावेळी टाळ वाजवत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. एकादशी निमित्त काढण्यात आलेल्या दिंडी मध्ये सामील होऊन आपली सेवा करत असताना त्यांनी आपला प्राण सोडला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.