

बेळगाव : बेळगावच्या कचऱ्यावर बेळगावातच प्रक्रिया करावी, तुरमुरीच्या हद्दीतील कचरा डेपो तत्काळ हलवावा, अशा मागण्या करत तुरमुरी गावकरी तसेच परिसरातील अकरा गावांतील रहिवाशांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यात लहान मुले, विद्यार्थी, महिला, दिव्यांग, वारकऱ्यांसह सर्वच वयोगट आणि व्यवसायातील लोक सहभागी झाले होते. तुरमुरीच्या हद्दीतील कचरा डेपो न हलवल्यास येणाऱ्या सगळ्या निवडणुकांवर 11 गावचे रहिवाशी बहिष्कार घालतील, असा इशाराही देण्यात आला. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पंधरा दिवसांत या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
तुरमुरीच्या हद्दीत कचरा डेपो आहे. तेथे बेळगावातील कचरा साठवला जातो. त्या डेपोची दुर्गंधी, पावसाळ्यात सांडपाणी, कुत्र्यांचा वावर, माशांची पैदास आणि त्यातून पसरलेली रोगराई या समस्यांचा सामना तुरमुरी गावासह उचगाव, बाची, कल्लेहोळे, कोनेवाडी, बसुर्ते, सुळगा, हिंडलगा, आंबेवाडी, मण्णूर, गोजगा या अकरा गावांना करावा लागतो. त्यामुळे आक्रमक झालेल्या तुरमुरी गावकऱ्यांसह परिसरातील गावांच्या रहिवाशांनी शुक्रवारी मोर्चा काढला. सरदार्स मैदानावरून मोर्चाला सुरुवात झाली. वारकरी भजन म्हणत, लहान मुले-महिला फलक हातात घेत आणि दिव्यांग तिचाकींसह मोर्चात सहभागी झाले होते.
आमच्या गावाजवळ भगवान रामलिंग मंदिराच्या जवळच टेकडीवर कचरा डेपो आहे. त्यामुळे आमचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी हा आमचा घटनात्मक अधिकार आहे. तोच आम्हाला मिळत नाही. गेल्या 20 वर्षांपासून बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदार संघांतील महानगर पालिकेचा कचरा तुरमुरी ग्रामीण मतदारसंघात येणाऱ्या गावात टाकला जातो, अशी तक्रार आंदोलकांनी मांडली.
शाळा जवळच
प्राथमिक आणि माध्यमिक शाळा कचरा डेपोच्या जवळच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. कचऱ्यातील दूषित जमिनीत झिरपून विहिरी आणि बोअरवेल दूषित करत आहे. मार्कंडेय नदीचे पाणीही त्यामुळे प्रदूषित होत आहे. त्यामुळे कचरा डेपो स्थलांतर करा, अशी मागणी करण्यात आली. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनाही निवेदन देण्यात आले आहे. आता ग्रामस्थांचा अंत पाहू नका, कचरा डेपो तत्काळ बंद झाला नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही गावकऱ्यांनी दिला.
पर्यायी जागेची पाहणी : डीसी
जिल्हाधिकारी रोशन आंदोलकांना सामोरे गेले. ते म्हणाले, पर्यायी जागेची पाहणी करत आहे. 60 टक्के ओला कचरा कमी करतो. सुका कचरा कमी केला जाईल. तो अन्य ठिकाणी टाकण्याची व्यवस्था केली जाईल. पंधरा दिवसांत निर्णय घेतला जाईल. त्यासाठी खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल.