बेळगाव : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सुवर्णसौधजवळ भरधाव कारने दुचाकीला आणि नंतर दुसऱ्या कारला धडक दिल्याने घटनास्थळीच धडक देणाऱ्या कारच्या चालकाचा मृत्यू झाला होता. तर दुचाकीवरील एक जण आणि धडक बसलेल्या कारमधील तिघे जखमी होते. मात्र सोमवारी आणखी एका जखमीचा मृत्यू झाला. त्यामुळे अपघातातील मृतांची संख्या दोन झाली आहे.
रविवार सकाळी हा अपघात झाला होता. असिफ मौलासाब हेब्बाळी ( वय 29 रा.विरापूर ता. कित्तूर) असे सोमवारी मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर हुबळी येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी अभिषेक सोमचंद्र रायकर (वय 25 रा.अनगोळ) याचा मृत्यू झाला होता. अभिषेक धारवाडवरून बेळगावकडे कारने येत असताना त्याचे कार वरील नियंत्रण सुटल्याने त्याने एका दुचाकीला आणि दुसऱ्या कारला धडक दिली होती.
अपघातात अभिषेकचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका कारमधील असिफ, मौलासाब एम. हेब्बाळी( वय 52 रा. विरापूर ता. कित्तूर), शोएब गिर्याळ (वय 24 रा. बस्तवाड ) हे जखमी झाले होते. या सर्वांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र असिफ याची प्रकृती गंभीर बनल्याने अधिक उपचारासाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेची नोंद हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात झाली आहे.