

बेळगाव : भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे तरुण ठार झाले. बुधवारी (दि. २) सायंकाळी साडेचारच्या सुमारास गोकाक तालुक्यातील हुनशाळ पीजी येथे हा अपघात घडला. विनय विजय हिरेमठ (वय १९, रा. नागनूर केएम.) व श्रवण गुरूसिद्धय्या हिरेमठ (१७, रा. उळागड्डी खानापूर) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
याबाबत घटप्रभा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सदर तरुण दुचाकीवरून हुनशाळ पीजीकडून संगनकेरीकडे निघाले होते. यावेळी समोरुन आलेल्या भरधाव टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिली. दोघेही रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.
घटनेनंतर टिप्परचालक न थांबता भरधाव निघून गेल्याने पोलिसांनी हिट ॲन्ड रनचा गुन्हा दाखल करून घेतला. घटप्रभा पोलिसांत नोंद झाली असून हेड कॉन्स्टेबल एम. एस. दोड्डण्णावर याचा तपास करीत आहेत.