

निपाणी : जत्रा, यात्रा, आठवडी बाजार, बसस्थानक किंवा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवला अथवा चोरीला गेला की तो पुन्हा मिळेल, अशी अपेक्षा अनेकजण सोडून देतात. मात्र निपाणी ग्रामीण पोलिसांनी केंद्र सरकारच्या ‘सीईआयआर’ (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या मदतीने तब्बल ४ लाख रुपये किमतीचे २१ हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून शुक्रवारी मूळ मालकांच्या स्वाधीन केले.
निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गत वर्षांत तसेच अलीकडील तीन महिन्यांत मोबाईल हरवल्याच्या आणि चोरीच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारी गांभीर्याने घेत पोलिसांनी ‘सीईआयआर’ पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक तपास सुरू केला.
तपासादरम्यान चोरीस गेलेले अनेक मोबाईल काही व्यक्तींनी कमी किमतीत खरेदी करून वापरात ठेवल्याचे उघड झाले. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवत विविध ठिकाणांहून हे मोबाईल जप्त केले. एकूण २१ मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांची अंदाजे किंमत सुमारे ४ लाख रुपये आहे. शुक्रवारी उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांच्या हस्ते हे मोबाईल संबंधित मालकांना परत देण्यात आले. हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
या मोहिमेत उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी, हवालदार आनंद कुंभार, महांतेश पाटील, रमेश शिलणवर, एम. एफ. नदाफ, मंजुनाथ खोत, रघू मेलगडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.