

बेळगाव : शहरात मंगळवारी झालेल्या वळीव पावसाने स्मार्ट सिटीत राबवण्यात आलेल्या विकासकामांचे पितळ उघडे पडले. पाण्याचा निचरा न झाल्याने सगळीकडे पाणीचपाणी झाले होते. सखल भागात पावसात पाणी साचण्याची समस्या जैसे थे आहे. सखल भागात पाणी साचल्याने घराघरांत तसेच तळघरात पाणी शिरून नुकसान झाले.
शहरात भूमीगत वीजवाहिन्या घालण्याचे काम अद्याप सुरुच आहे. वादळी वार्यामुळे झाडाच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्या. त्यामुळे अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला. वळीव पावसाच्या दणक्याने शहर परिसरात गटारीतून पाण्याचा निचरा झाला नसल्याने पाणी तुंबले होते. सखल भागात पाण्याचा निचरा झाला नसल्याने रस्त्यावर पाणी साचले होते. या पाण्यातूनच वाहनचालकांना वाट काढावी लागत होते. यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळाली. प्रामुख्याने शहरात पाण्याचा निचरा न झाल्याने शहरात सगळीकडे पाणीचपाणी झाले. त्यामुळे शहरवासियांतून संताप व्यक्त करण्यात आला.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहर उपनगरातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली. यावर कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करूनही जोरदार पावसामुळे साचणाऱ्या सांडपाण्याचा निचरा होत नाही. वळीव पावसामुळे स्मार्ट सिटीची अवस्था बेहाल झालेली पाहायला मिळाली. पावसाळा तोंडावर आहे. त्याआधी शहरातील गटारी, नाल्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी शहरवासीयांतून होत आहे.