

बेळगाव : श्रावणानिमित्त मेंढपाळांकडून आयोजित कुरी लक्ष्मीदेवी जत्रोत्सवात फटाके फोडले जात असताना बिथरलेल्या मेंढ्यांचा कळप उधळला. या गोंधळात जवळच असलेल्या कालव्यात पडून ७५ मेंढ्या आणि ५ पिल्ले अशा सुमारे ८० मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच मुडलगी तालुक्यातील यादवाडमध्ये घडली. या दुर्घटनेत मेंढपाळांचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
फटाक्यांचा मोठा आवाज झाल्यानंतर मेंढ्या घाबरुन सैरावैरा पळू लागल्या. त्यामधील अनेक मेंढ्या जवळच्या कालव्यात पडल्या. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत ७५ मेंढ्या आणि ५ पिल्ले दगावल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
फटाक्यांच्या आवाजामुळेच मेंढ्या कालव्यात पडल्या की अन्य काही कारण आहे का, याचा तपास सुरु करण्यात आला आहे. मृत मेंढ्यांची नेमकी संख्या आणि झालेल्या आर्थिक नुकसानीचा अंतिम आकडा प्रशासन व पोलिसांच्या पाहणीनंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मेंढपाळांसाठी ही मोठी आर्थिक हानी असून प्रशासनाने तातडीने पंचनामा करुन नुकसानग्रस्त मेंढपाळांना शासनाकडून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.