

बेळगाव : स्वस्त धान्य दुकाने ठराविक वेळीच सुरू आणि इतर वेळी बंद राहत असल्याने अनेक रेशन कार्डधारकांना धान्य मिळवणे जिकीरीचे ठरले होते. त्यामुळे जुलै महिन्यातील धान्य वितरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि कोणताही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी राज्यातील सर्व रेशन दुकाने रोज सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आहार आयुक्तालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आणि अन्नभाग्य योजनेंतर्गत धान्य वितरण महिनाअखेरीस पूर्ण करण्याचे आहे. काही दुकानदार ठराविक वेळेतच दुकान सुरू करत होते. त्यामुळे कामगार, नोकरी इतर कामांमुळे धान्य घेण्यासाठी वेळ न मिळणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकही शिधा पत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित राहू नये, हे सरकारचे उद्दिष्ट आहे. सर्व रास्तभाव दुकान चालकांनी सरकारच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे. वितरण प्रक्रिया पारदर्शक ली पाहिजेत, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
परिपत्रकातील महत्त्वाचे मुद्दे
रेशन दुकानांमध्ये धान्य उपलब्ध होताच वितरण सुरू करावे. जुलैचे वितरण पूर्ण होईपर्यंत सर्व दुकाने सकाळी ६ रात्री १० या वेळेत सुरू ठेवणे बंधनकारक राहील. जिल्हा संयुक्त संचालक व उपसंचालकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व रेशन दुकानांतून सुरळीत धान्य वितरण होत आहे, याची खात्री करून घ्यावी.