

बेळगाव : अवयदानातून गरजूंना जीवदान मिळते. यासाठी आरोग्य खात्याने चालविलेल्या जनजागृती मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील तब्बल ६७,६३२ लोकांनी अवयवदान करण्यासाठी नोंदणी केली आहे. यामध्ये बेळगाव जिल्हा राज्यात सहाव्या स्थानी असून २,९५७ जणांनी नोंद केली आहे. धारवाड जिल्हा राज्यात अव्वल असून १२,५३४ लोकांनी नोंदणी केली आहे.
अवयवदान ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे, यामध्ये एखादी व्यक्ती दुसऱ्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आपल्या हयातीत किंवा मृत्यूनंतर आपले निरोगी अवयव दान करते. १८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती अवयवदानासाठी नोंदणी करु शकते. आरोग्य खात्याच्या माहिती, शिक्षण आणि संवाद धोरणांतर्गत, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जनजागृती केली जात आहे. यावेळी क्यूआर कोडद्वारे ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येते. यामुळे अवयवदान करण्यासाठी अनेकजण पुढे सरसावत आहेत.
एक दाता वाचवू शकतो आठ जीव
एक मृत अवयव दाता आठ जीव वाचवू शकतो. मेंदूचे कार्य कायमचे थांबल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर माहिती दिल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया आणि कुटुंबाच्या संमतीने हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे यांसारख्या विविध अवयवांचे प्रत्यारोपण केले जाऊ शकते. डोळे दान केल्याने दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनात प्रकाश येऊ शकतो.
मोहिमेला प्रतिसाद
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली राष्ट्रीय अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्था २०२३ पासून देशभरात अवयव दानाबद्दल जनजागृती करत आहे. याव्यतिरिक्त, आरोग्य खाते स्थानिक पातळीवर मोहीम राबवत आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकांमध्ये जागृती होत आहे. अवयवदानासाठी अनेकजण पुढे सरसावत आहेत.
धारवाड अव्वल
अवयव दानामध्ये धारवाड जिल्हा अव्वल आहे. त्यानंतर, बळ्ळारी असून त्याठिकाणी १२,२२२ जणांनी अवयवदान नोंदणी केली आहे. बळ्ळारी जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. तिसऱ्या स्थानी गदग असून ६,०७० जणांनी नोंदणी केली आहे. विजापूर शेवटच्या स्थानी आहे. त्याठिकाणी ३०१ जणांनी नोंदणीं केली आहे.
जनजागृतीतून यश
प्रारंभीच्या काळात अवयव दान करण्याऱ्यांची संख्या खूपच कमी होती. आरोग्य मेळावे, शिबिरे आणि विशेष कार्यक्रमांच्या माध्यमातून अवयवदानाने आणखी एकाचा जीव वाचू शकतो, हा संदेश लोकांपर्यंत सातत्याने पोहोचवल्यामुळे नोंदणी दरात लक्षणीय वाढ झाली आहे. धारवाड जिल्हा गेल्या दोन वर्षांपासून राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.