

खानापूर : बेळगाव आणि खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवार, दि. ७ जुलै रोजी बेळगाव व खानापूर तालुक्यातील अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच बारावीपर्यंतच्या सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी यासंदर्भात आदेश जारी केला असून, हा निर्णय बेळगाव व खानापूर तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व शैक्षणिक संस्थांना लागू राहणार आहे. सलग सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचणे, झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि वाहतुकीवर परिणाम होणे अशा घटना घडत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी-नाले व पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे तसेच हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. खानापूर व बेळगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून जनजीवनावरही त्याचा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रशासनाने शाळा व महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.