

चिकोडी : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सीमाभागातील चिकोडी तालुक्यातील नदीकाठच्या गावांवर पुराचे संकट ओढवले आहे. कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत बुधवारी अचानक तब्बल ४ फुटांनी वाढ झाली असून, यामुळे नदीकाठचे शेतकरी चिंतेत आहेत.
महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रातून कृष्णा नदीत कल्लोळ गावाजवळ मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे. सध्या नदीमध्ये सुमारे १ लाख २२ हजार क्युसेक वेगाने पाणी वाहत असून नद्या ओसंडून वाहत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यातून चिकोडी तालुक्याला ९७ हजार १९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. तसेच, दूधगंगा नदीतून तेवीस हजार नऊशे तीस क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
कृष्णा व दूधगंगा दोन्ही नद्या मिळून चिकोडी तालुक्यातील कल्लोळ येडूर बंधाऱ्यातून कृष्णा नदीला एक लाख २२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. तसेच, जमखंडी तालुक्यातील हिप्परगी बंधाऱ्यातून ९७ हजार ८५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.