

चिकोडी : महाराष्ट्राच्या पश्चिम घाट परिसरात पाऊस धुमाकूळ घालत असून याचा परिणाम बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील नद्यांवर झाला आहे. महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिकोडी तालुक्यातील प्रमुख नद्या असलेल्या कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीत अवघ्या एका दिवसात तब्बल ५ फुटांनी वाढ झाली आहे.
सध्या चिकोडी उपविभागाला पुराचा धोका नाही. सुरुवातीला पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेत असलेल्या नागरिकांना नदीत पाणी आल्याने एका बाजूला दिलासा मिळाला आहे; तर दुसऱ्या बाजूला पाण्याचा वाढता वेग आणि पातळी पाहून पुराची धास्ती लागली आहे. कृष्णा नदीत चाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होता.
सीमाभागातील अलमट्टी व हिप्परगी धरणांत पाण्याचा साठा कमी आहे. अलमट्टी भरण्यासाठी सुमारे १०० टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यामुळे सध्या पावसामुळे व महाराष्ट्रातून येणारे पाणी वाहून पुढे जात आहे. त्यामुळे चिकोडी उपविभागाला सध्या तरी पुराची भीती नाही, असे चिकोडीचे तहसीलदार राजेश बुर्ली यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.