

बेळगाव : हरवलेले मोबाईल परत मिळण्याची आशा अनेकदा मावळते. मात्र, माळमारुती ठाण्याच्या पोलिसांनी तांत्रिक कौशल्य आणि सीईआयआर पोर्टलच्या वापरातून विविध कंपन्यांचे तब्बल ४६ हरवलेले मोबाईल फोन शोधून काढत ते त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन केले. शनिवारी (दि. २६) आयोजित कार्यक्रमात संबंधितांना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले.
माळमारुती पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल हरवल्याच्या तक्रारी नागरिकांनी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून मोबाईलचा माग काढण्याची मोहीम हाती घेतली. तांत्रिक तपास आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे विविध कंपन्यांचे एकूण ४६ मोबाईल शोधण्यात यश आले. त्यामुळे अनेक नागरिकांना त्यांचा मौल्यवान डेटा आणि मोबाईल परत मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
हरवलेले मोबाईल शोधून काढण्याच्या या मोहिमेमुळे पोलिसांबद्दल नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे उघडकीस आणण्याबरोबरच नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी पोलिस तत्पर असल्याचे पुन्हा एकदा निष्पन्न झाले आहे.
या कारवाईत पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, पोलिस उपनिरीक्षक आनंद अडगोंड, श्रीशैल हुळगेरी, उदय पाटील, पी. एम. मोहिते यांनी मार्गदर्शन केले. तसेच पोलिस कर्मचारी संदीप नाडगेरी, महेश मळगली, डी. व्ही. मुरगोड, बसवराज कुल्लोळी आणि तांत्रिक कर्मचारी रमेश अक्की, महादेव यांनी विशेष परिश्रम घेत महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले. नागरिकांनीही हरवलेले मोबाईल परत मिळाल्याबद्दल माळमारुती पोलिसांचे आभार मानले.