

बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांना घटनात्मक हक्क मिळावेत, कन्नडसक्ती थांबवावी, मराठीतून कागदपत्रे मिळावीत आणि सरकारी कार्यालयांवर मराठीतून फलक लावण्यात यावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची जनजागृती करण्यासाठी सोमवारपासून (दि. १५) शहरात फेरी काढण्यात येणार आहे.
मराठी फलकांच्या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी आणि शहर पोलिस आयुक्तांना माहिती दिली आहे. त्यानुसार सोमवारपासून शहरात ठिकठिकाणी जनजागृती फेरी काढून लोकांना माहिती देण्यात येणार आहे. कर्नाटक सरकारने केलेल्या कायद्यानुसार सर्व फलकांवर ६० टक्के भागात कन्नड आणि उर्वरित भागात इतर भाषांचा वापर करावा, या कायद्याची सरकारी कार्यालयावर असलेल्या फलकांवर अंमलबजावणी करण्यात येत नाही.
याशिवाय सर्वत्र कानडीकरणसाठी दबाव घालण्यात येत आहे. त्यामुळे या विरोधात मोर्चा काढायचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने बैठकीत निर्णय घेतला. त्यानुसार २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची जागृती करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. या जनजागृती फेरीद्वारे संपूर्ण शहर पिंजून काढण्यात येणार आहे. सोमवारपासून पाच दिवस ही जागृती होणार आहे.