

बेळगाव : कंग्राळी बुद्रूक येथे क्षुल्लक कारणातून झालेल्या हाणामारीप्रकरणी काकती पोलिसांत परस्परविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एका गटातील सहा जणांविरोधात तर दुसऱ्या गटातील तिघांवर गुन्हा दाखल झाला. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडलेल्या या घटनेची 31 रोजी काकती पोलिसांत नोंद झाली आहे.
पहिल्या घटनेत गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये यल्लाप्पा सुब्बराव पुजारी, पार्वती महादेव कोळी, मीनाक्षी चंद्रकांत कोळी, नितीन यल्लाप्पा कोळी, अविनाश महादेव कोळी, चेतन महादेव कोळी (सर्वजण रा. कंग्राळी बुद्रूक) यांचा समावेश आहे. या प्रकरणी कुमार कल्लाप्पा कोळी (रा. कैवल्यनगर, गौंडवाड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, कंग्राळीची यात्रा जवळ येत असल्याने तेथे आपल्याला यात्रा काळात दोन खोल्या देण्यावरून चर्चा सुरू होती. यावेळी वाद वाढत जाऊन फिर्यादी, त्याची पत्नी व वहिनीला अर्वाच्च शिवीगाळ करत मारहाण केली.
दुसऱ्या गटाकडून श्रीमती मीनाक्षी चंद्रकांत कोळी (वय 38, रा. सतीश कॉलनी, न्यू वैभवनगर, सध्या कंग्राळी बुद्रूक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अचलामृत कुमार कोळी (वय 22), श्रीदेवी लक्ष्मण कोळी (वय 30), शोभा जगदीश कट्टीमणी (सर्वजण रा. बैलहोंगल) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मीनाक्षी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, एप्रिलमध्ये कंग्राळी यात्रा आहे. येथील मालमत्तेत आपला वाटा आहे. त्यामध्ये आम्हाला वाटा मिळाला पाहिजे, असे म्हटल्यानंतर भांडण काढत आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना मारहाण केली. काकती पोलिसांनी दोन्ही गटांची फिर्याद नोंद करून घेतली असून, निरीक्षक सुरेश शिंगे तपास करीत आहेत.