

बेळगाव : सोयाबीनच्या क्षेत्रात दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. केवळ दहा वर्षांच्या कालावधीत राज्यात दीड लाख हेक्टरने क्षेत्र वाढले आहे. मिळणाऱ्या निश्चित दरांमुळे शेतकऱ्यांकडून इतर पिकांच्या तुलनेत सोयाबीनला पसंती देण्यात येत आहे.
सोयाबीनचा वापर प्रामुख्याने तेलांसाठी केला जातो. त्याचबरोबर खाद्य पदार्थांमध्येही वापर करण्यात येतो. परिणामी, इतर पिकांच्या तुलनेत सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. वीस वर्षांच्या मागे सोयाबीनचे उत्पादन पहिल्यांदा घेण्यात आले. त्यानंतर याचे वाढत गेले. राज्यात २०१५-१६ या वर्षात २.१८ लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. तर यंदाच्या खरीप हंगामात ३.७३ लाख हेक्टर क्षेत्रात वाढ झाली आहे. दहा वर्षाच्या कालावधीत १.५५ लाख हेक्टर क्षेत्र वाढले आहे.
बेळगाव जिल्ह्यात २०२१ च्या खरीप हंगामात १.०२ लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचे पीक घेण्यात आले होते. यंदा १.०७ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात पाच वर्षांत अंदाजे ८० हजार हेक्टर क्षेत्रात पीक वाढले आहे. बेळगाव जिल्ह्यात १.०७ लाख, बिदर १.९० लाख हेक्टर, धारवाड ३९,५५९ लाख, गुलबर्गा १९,०३१ तर हावेरी १३,७२५ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचे पीक घेण्यात येत आहे. यापूर्वी भुईमूग, मूग, उडीद, कापूस आदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे वाढला आहे.
सोयाबीनचे पीक कमी कालावधीत मिळते. ९० ते ११० दिवसांत कापणीला येते. याकालावधीत केवळ तीन ते चार पावसाची गरज लागते. प्रति एकरला १० ते १४ हजार रुपयांचा खर्च येतो. सरासरी ९ क्विंटल उत्पादन मिळते. यंदा सोयाबीनला ४५०० रुपये दर मिळाला. केवळ तीन महिन्यात एकरला खर्च वजा जाता ३० ते ३५ हजार उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांचा या पिकाकडे ओढा वाढला आहे.