

काशिनाथ सुळकुडे
चिकोडी : महाराष्ट्रातील कोकण आणि घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या जलपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी, बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कुडची-उगार दरम्यान असलेल्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा प्रमुख रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला असून आंतरराज्य वाहतूक काही प्रमाणत ठप्प झाली आहे. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या पुलावरील वाहतूक बंद केली आहेत. दोन्हीकडे पोलिस दल तैनात करण्यात आले आहेत.
कृष्णा नदीला पूर; उगार-कुडची पूल जलमय
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कुडची आणि कागवाड तालुक्यातील उगार दरम्यान असणारा हा पूल पूर्णपणे पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहे. हा पूल कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा (कनेक्टिव्हिटी) म्हणून काम करतो. मात्र, पूल जलमय झाल्याने दोन्ही राज्यांमधील संपर्क आता पूर्णपणे तुटला आहे.
वाहतूक ठप्प; प्रशासनाचा हायअलर्ट
सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने पुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स लावून वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीच्या पातळीत सतत वाढ होत असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
महामार्ग बंद: जमखंडी-मिरज राज्य महामार्गावरील वाहतूक या पुरामुळे पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनधारकांना लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे.
नागरिकांना आवाहन: कृष्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा (हायअलर्ट) दिला आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.