

बेळगाव: खानापूर तालुक्यातील कौंदल गावात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारी चोरीची घटना घडली आहे. गावातील शेतकरी मारुती गणतीपत पाटील यांच्या गोठ्यात बांधून ठेवलेली सुमारे ५० हजार रुपये किमतीची बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. मारुती पाटील यांनी नेहमीप्रमाणे आपल्या गोठ्यात बैलजोडी बांधून ठेवली होती. मात्र सकाळी गोठ्याकडे गेल्यानंतर बैलजोडी जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर परिसरात शोधाशोध करण्यात आली, परंतु बैलांचा कोणताही मागमूस लागला नाही.
या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली जनावरे चोरीला जात असल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी गावात पोलिस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
घटनेची माहिती संबंधित पोलिस ठाण्यात देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. गावातील नागरिकांनी संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.