

बेळगाव : गेल्या तीन वर्षांमध्ये जिल्ह्यात २९ सरकारी अधिकाऱ्यांवर लोकायुक्त छापे पडले आहेत. राज्यातील ही आकडेवारी ८८७ असून यापैकी बहुतांश प्रकरणांचा तपास अद्यापही रखडलेला आहे.
लोकायुक्त खात्याकडे दाखल झालेल्या एकूण प्रकरणांची माहिती देण्यासंबंधी विधान परिषद सदस्य मधु मादेगौडरु यांनी यांनी विधान परिषदेत विचारली होती. जानेवारी २०२३ ते ऑगस्ट २०२६ या काळात राज्यभरात ८८७ प्रकरणांची नोंद झाली आहे. यामध्ये १,१५६ सरकारी अधिकाऱ्यांविरोधात लोकायुक्त पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये २९ सरकारी अधिकारी व कर्मचारी बेळगाव जिल्ह्यातील आहेत. यापैकी अनेकांनी थेट, फोन-पे, गुगल-पेद्वारे लाच घेतल्याचे सिद्ध स्पष्ट झाले आहे.
सर्वाधिक महसूल भ्रष्ट
राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचार हा महसूल खात्यात होत असून यानंतर पंचायतराज विभागाचा लागतो. एकूण प्रकरणांपैकी २०८ प्रकरणे महसूल खात्याकडे, पंचायतराज विभाग-१२१, पोलीस खाते-१०५, नगरविकास-९८ यानंतर इंधनसह अन्य विभागांकडे ७७ प्रकरणांची नोंद झाली आहे. या पाच विभागाकडे ६०९ म्हणजे ६९ टक्के प्रकरणांची नोंद झालेली आहे. यावरुन या सरकारी विभागात होणाऱ्या भ्रष्टाचाराचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते.
लाचखोरी अधिक
महसूल विभागातील कोणतेही काम लाच दिल्याशिवाय होत नाही, हे स्पष्ट झाले आहे. या विभागातील कामे वेळेत होत नसल्याच्या लोकांच्या तक्रारीही अधिक असल्याचेही दिसून आले आहे. हजारो रुपयांची लाच घेतल्याशिवाय या विभागातील कामे केली जात नसल्याने अनेक लोकांची कामे महिनोन् महिने फाईली धूळ खात पडल्याच्याही तक्रारी आहेत.