

बेळगाव : पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत असलेल्या बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यांतील जनतेला अखेर एक सुखद बातमी मिळाली आहे. प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांनी हिडकल जलाशयातून घटप्रभा नदीमध्ये सोमवारपासून (दि. १८) १.६० टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश दिला आहे.
घटप्रभा नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यांतील गावांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हे पाणी केवळ जनतेच्या पिण्याच्या वापरासाठीच वापरले जावे. या पाण्याचा वापर शेतीविषयक कामांसाठी करता येणार नाही, असे प्रादेशिक आयुक्तांच्या आदेशात नमूद आहे.
नदीकाठावर अनधिकृत पंप संच वापरुन पाण्याची चोरी केल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा व्यवस्थापन मंडळाने दिला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या पंप संचांची वीज जोडणी कापण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाणी उपसण्यासाठी सौर ऊर्जा मोटर्स आणि जनरेटर्सच्या वापरांवरही पूर्ण बंदी घालण्याचे आणि यावर कडक पाळत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.