

बंगळूर : मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्यात किमान एका महिलेला मंत्रीपद मिळेल, असा आम्हांला विश्वास आहे. पक्षाचे हायकमांड जो काही निर्णय घेतील, त्याला आम्ही बांधील आहोत, असे माजी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार ज्येष्ठ आणि सक्षम नेते आहेत. ते सर्वांना विश्वासात घेऊन सरकार चालवतील, असे त्यांनी सांगितले.
बेळगावातील राजकारण तुमच्या मंत्रीपदाच्या आड येत आहे का, असे विचारले असता, त्यांनी हे कारण फेटाळून लावले. त्या म्हणाल्या, २०२३ मध्येच सर्व काही ठरले आहे. आम्ही पूर्ण विश्वासाने पुढे जात आहोत. बेळगाव जिल्हा राज्यातील इतर तीन जिल्ह्यांइतका मोठा आहे. त्यामुळे आम्ही आणखी दोन मंत्रिपदांची मागणी केली आहे. बेळगाव जिल्ह्याला एकूण तीन मंत्रिपदे मिळावीत. रामलिंगा रेड्डी यांच्या राजीनाम्याबद्दल विचारले असता, त्या म्हणाल्या, लोकशाहीत प्रत्येकाच्या मतांना महत्त्व असते. यावर पक्षातील ज्येष्ठ नेते निर्णय घेतील.