

बेळगाव : गोकाक तालुक्यातील भेंडीगेरी येथील एका व्यक्तीने डीवायएसपी व पीएसआय यांची नावे चिठ्ठीत लिहून आत्महत्या केली आहे, यामुळे खळबळ माजली आहे. रवींद्र दानव्वगोळ असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. व्याजाने दिलेली रक्कम परत न केल्याने व्यथित होऊन त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
रवींद्रने चिठ्ठीत लिहिले आहे की, त्याने दिलेले पैसे परत मागितल्याबद्दल त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे भीतीने आत्महत्या करत आहे. त्याने असेही नमूद केले आहे की, पोलिसांनीही त्याच्यावर अन्याय केला आहे. या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.
रवींद्र याने लक्ष्मण चंदरगी आणि भरमप्पा पुजारी यांना ८ लाख रुपयांचे कर्ज दिले होते. परंतु, लक्ष्मण चंदरगी आणि भरमप्पा पुजारी यांनी हे पैसे परत केले नाहीत. उलट, त्यांनी पैसे मागितल्याबद्दल रवींद्रला जीवे मारण्याची धमकी दिली. रवींद्र याने पीएसआय आनंद आणि डीवायएसपी मुल्ला यांच्याकडे तक्रार केली होती. परंतु, पोलिसांनी यावर काहीही कारवाई केली नाही. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत रवींद्रने पोलिसांनी त्याला धमकी दिली होती, असेही म्हटले आहे.
मुडलगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रवींद्र दानव्वगोळ यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुडलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.