

अथणी : राज्यात पंचमसाली समाजाचे २५ आमदार असून त्यापैकी किमान ५ ज्येष्ठ आमदारांना मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेत स्थान द्यावे, अशी मागणी पंचमसाली समाजाचे नेते बसगौडा पाटील यांनी केली.
बोमनाळ येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. बसगौडा पाटील म्हणाले, राज्यात सर्वाधिक आमदार निवडून आणण्यासाठी पंचमसाली समाजाचा मोठा वाटा आहे. लवकरच राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना होणार असून त्यामध्ये पंचमसाली समाजाला ५ मंत्रिपदे देण्यात यावीत. यासाठी आ. लक्ष्मी हेब्बाळकर, आ. गणेश हुक्केरी, आ. राजू कागे, आ. शिवानंद पाटील आणि आ. विजयानंद काशप्पनवर यांचा विचार करावा. हे सर्व ज्येष्ठ व अनुभवी आमदार असून त्यांनी आपल्या कार्यकाळात प्रभावी नेतृत्व सिद्ध केले आहे.
पंचमसाली समाज काँग्रेस पक्षाच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभा राहिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि पक्ष नेतृत्वाने समाजाच्या योगदानाची दखल घेऊन मंत्रिमंडळात योग्य प्रतिनिधित्व द्यावे. चिकोडी विधानसभा मतदारसंघात आ. प्रकाश हुक्केरी व आ. गणेश हुक्केरी यांना जनतेने सातत्याने निवडून दिले आहे. सत्ता असो वा नसो, जनतेचा त्यांच्यावर कायम विश्वास राहिला आहे. अशा अनुभवी आणि जनाधार असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे, अशी मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पुंडलिक आळेकर, आनंद जाधव, विशालगौडा पाटील आदी उपस्थित होते.