

बेळगाव : आयटीआय, डिप्लोमा आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी एलएलबीसाठी प्रवेश घेतला होता. मात्र बारावी पूर्ण झाली नाही म्हणून कर्नाटक राज्य कायदा विद्यापीठाने त्यांचा प्रवेश अवैध ठरवला होता. त्याविरोधात विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने निकाल देत या तिन्ही विभागाचा अभ्यासक्रम एलएलबीसाठी पात्र असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
म्हैसूर येथील जावेद खान यांच्यासह नऊ विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने हा निकाल दिला असून आता डिप्लोमाधारक विद्यार्थीही वकील बनू शकतात हे निश्चित झाले आहे. डिप्लोमा शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी राज्यातील विविध कायदा महाविद्यालयांत एलएलबीसाठी प्रवेश घेतला होता. मात्र, त्यांनी बारावीचे शिक्षण पूर्ण केले नसल्याने कर्नाटक राज्य कायदा विद्यापीठाने त्यांचा प्रवेश अवैध ठरवला होता. यामुळे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने स्पष्ट केले की, डिप्लोमा आयटीआय अभ्यासक्रमांना ‘सीनियर स्कूल सर्टिफिकेट’ पुरेसे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट पाच वर्षांच्या एकत्रित एलएलबी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात कोणतीही अडचण नाही. त्यामुळे आता डिप्लोमा झालेले विद्यार्थी वकील बनू शकतात. त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये झालेल्या परीक्षांचा निकाल तातडीने देऊन विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश द्यावा असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्यावतीने ॲड. नमन वंकलारी यांनी युक्तिवाद केला.