

बेळगाव : म्हादआणि कळसा-भांडुरा प्रकल्पांमुळे पश्चिम घाटातील जैवविविधता आणि वनसंपदेला धोका निर्माण झाला असून, संपूर्ण उत्तर कर्नाटकचे रूपांतर पावसाअभावी वाळवंटात होणार आहे, असा आरोप करत पर्यावरणवादी आंदोलकांनी या प्रकल्पासह हिडकल जलाशयाचे पाणी हुबळी-धारवाडकडे वळवण्याच्या प्रकल्पाविरोधात ‘बेळगाव वाचवा’ या घोषवाक्याखाली मंगळवारी (दि. 3) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यामध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
खानापूर तालुक्यासह बेळगावच्या लोकांसाठी महत्त्वाच्या उत्तर कर्नाटकाची जीवनदायिनी असलेल्या म्हादई नदीचे रक्षण करण्यासाठी सकाळी सरदार्स हायस्कूल मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यामध्ये शेतकरी, विद्यार्थी आणि निसर्गप्रेमी सहभागी झाले होते.
यावेळी राष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणीय कार्यकर्त्या 17 वर्षीय रिद्धिमा पांडे म्हणाल्या, आपल्या नद्या, जंगले आणि परिसंस्था वाचवण्यासाठी अनेक वर्षांपासून परिश्रम घेतले जात आहेत. त्या परिश्रमांना पाठिंबा देण्यासाठी आज मी येथे आले आहे. सर्वांनी लक्षात घ्यावे जंगलाविना झाडे व पाणी नसेल आणि त्यानंतर आपले काहीही अस्तित्व नसेल. आज आपल्याला फक्तमोर्चा काढायचा नाही, तर सर्वांनी आपण काय बदलू शकतो, पर्यावरण कसे वाचेल, मी काय करू शकतो की ज्यामुळे म्हादई नदी वाचेल हा विचार आपल्या सोबत घेऊन जायचा आहे.
म्हादई वाचावा; आमचे भविष्य वाचवा, असे फलक हातात घेऊन सरदार्स हायस्कूल मैदानावरून कॉलेज रोड, चन्नम्मा सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. म्हादई वाचली तर मलप्रभा वाचेल, आमची म्हादई वळवू नका तिला मुक्त वाहू द्या, आमचे पाणी आमचा हक्क.. म्हादाई वळवल्यास आमची दुर्दशा असे विविध जागृती फलक लक्षवेधी ठरले. मोर्चामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोर्चाची सांगता झाली. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकार्यांनी त्यातील मागण्या सरकार दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले. म्हादई प्रकल्पासह हिडकल जलाशयाचे पाणी हुबळी-धारवाडकडे वळवण्याच्या प्रकल्पा विरोधातील आजच्या या जनआंदोलनाचे नेतृत्व दिलीप कामत, शिवाजी कागणीकर, निवृत्त कॅ. नितीन धोंड, अमृत चरंतीमठ, लिंगराज जगजंपी, सुरेश हेबळीकर, नाईला कोयलो, अॅड. नीता पोतदार, शारदा गोपाळ, सुजित मुळगुंद आदींनी केले.
मार्चात माजी महापौर सरिता पाटील, जयराज हलगेकर, अप्पासाहेब गुरव, चंद्रकांत गुंडकल, राजीव टोपण्णावर, नगरसेवक रवी साळुंखे, राजेंद्र मुतगेकर, जयवंत साळुंखे, उत्तम पाटील, चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी आदी सहभागी झाले होते.
आपण कितीही पैसे कमवले कितीही मोठ्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या तरी शेवटी झाडेच आपल्याला जिवंत ठेवणार आहेत. तेव्हा झाडे, नद्या यांचा आवाज आपण बनले पाहिजे, असे सांगून आजचे हे जनआंदोलन बदल घडवणारे ठरावे, अशी अपेक्षा पांडे यांनी व्यक्त केली.