

बेळगाव : शहरातील कपिलेश्वर तलावाच्या ठिकाणी भिंत कोसळून दोन बालकांचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत. ती जागा महापालिकेने ताब्यात घ्यावी, असा पत्रव्यवहार महापालिकेशी केला होता. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. महापालिका कधी जागी होणार? अजून किती बळी हवेत, असे संतप्त सवाल स्थानिक रहिवासी व गोडसे परिवाराने प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांच्याकडे केले.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, गोडसे परिवार आणि स्थानिक रहिवाशांनी मंगळवारी (दि. ५) प्रादेशिक आयुक्त जानकी यांची भेट घेऊन आपल्या मागण्या सादर केल्या. गोडसे परिवाराने आपली बाजू मांडली, सदर जमीन हस्तांतरीत करण्यास तयार आहे. याबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे. महापालिकेने याबाबत गांभीर्याने विचार करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रादेशिक आयुक्त जानकी म्हणाल्या सदर तलाव प्रकरणाची चौकशी केली जाईल. योग्य तोडगा काढला जाईल. सदर जमीन पालिकेने ताब्यात घेऊन विकास करावा, याबाबत दुमत नाही. जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी आदींची बैठक घेऊन त्यावर योग्य तोडगा काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी विकास कलघटगी, धनंजय पाटील, मनोहर हुंद्रे, शिवाजी मंडोळकर, नारायण मुचंडीकर, श्रीकांत गोडसे, संजय पाटील, महेश गोडसे, ए. बी. गोडसे, तृप्ती गोडसे, जोतिबा गोडसे, मोतेश बारदेसकर, प्रकाश हेब्बाजी, राजू पाटील आदी उपस्थित होते.
दै. 'पुढारी' बातमीचा मथळा वाचून दाखविला
स्थानिक रहिवासी व गोडसे परिवार प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांना कपिलेश्वर तलावाची घटनेबाबत माहिती देत असताना दै. पुढारीतील छापून आलेली बातमी दाखविण्यात आली. त्यानंतर आयुक्त जानकी यांना माहिती दिली. त्या तलावाने पुन्हा आजू-बाजूच्या घरांच्या भिंतीने तडे गेले आहेत. धोकादायक घरातून कुटुंबाने अन्य ठिकाणी स्थलांतर केल्याचे त्यांना सांगण्यात आले.
"कपिलेश्वर तलावामुळे अनेक समस्या उद्भवली आहे. येथे नाहकांचा बळी जात आहे. प्रशासन डोळे झाकून बसले आहे. गोडसे परिवाराने ही जागा महापालिकेकडे हस्तांतरण करण्यास यापूर्वीच तयारी दर्शविली आहे. मात्र ही प्रक्रिया महापालिकेकडूनच रखडली. तलावाचा विकास खुंटला आहे. जर यापूर्वीच विकास झाला असता तर ही घटना टळली असती."
- उषा गोडसे, रहिवासी