

बेळगाव : घाईत असताना आपण सिग्नलला पोहोचलो अन् तो लाल झाला तर आपला तीळपापड होतो. सध्याच्या तप्त उन्हात जर सिग्नल लाल झाला दुचाकीस्वारही गरम होणे साहजिकच. परंतु, जर सिग्नल आणि सूर्यही लाल असताना वरून थोडा गारवा मिळाला तर कसे ठंडा ठंडा कूल कूल वाटेल नाही...? होय, दुचाकीस्वारांना अशीच ठंडा ठंडा कूल कूल राहण्याची सोय प्रशासनाने चक्क चन्नम्मा सिग्नलला केली आहे.
उन्हाचा पारा ४० अंशांच्या आत येण्यास तयार नाही. दिवसेंदिवस ऊन वाढतच आहे. त्यामुळे घराबाहेर पडणेही मुश्कील बनले आहे. परंतु, कामासाठी बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही. परंतु, दुचाकीस्वार जेव्हा सिग्नलला थांबतात तेव्हा थोडे पुढे, पाठीमागे कुठे सावली आहे का पाहून थांबण्याचा विचार करतात. जेथे पर्यायच नाही तेथे उन्हात थांबण्याशिवाय पर्याय नसतो. मिनी महाबळेश्वरतही पारा वाढतो आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी महंमद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांना एक आयडियाची कल्पना सुचली अन् त्यांनी ती ताबडतोब अमलात आणली.
पाणीही फवारले तर आणखी कूल
सिग्नलजवळ असे टेंट विजापूर, गुलबर्गा व बिदर येथेही उभारले जातात. कारण, तिकडे तर इथल्यापेक्षाही खूप गरमी असते. टेंट उभारण्याबरोबरच तेथे दररोज दुपारी या कापडावर पाणीही फवारले जाते. जेणेकरून वाहनधारकांना थंडावा जाणवावा. आता टेंट उभारलेलेच आहे. जिल्हा व पोलीस प्रशासनाने यावर पाणी फवारण्याचीही सोय केल्यास दुचाकीस्वारांना आणखीनच ठंडा ठंडा कूल कूल वाटेल, हे निश्चित!
चन्नम्मा चौकात कुलिंग टेंट
सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचा तडाखा जाणवत आहे. बेळगावातील सर्वाधिक रहदारी असलेला चौक म्हणजे चन्नम्मा चौक. शहराच्या या मध्यवर्ती चौकातून दररोज लाखोंच्या संख्येने वाहनांची ये-जा सुरू असते. याचाच विचार करून येथे हिरवा पडदा लावून कुलिंग टेंट उभारला आहे, जेणेकरून रेड सिग्नल लागल्यानंतर वाहनधारक विशेषतः दुचाकीधारक या टेंटखाली थांबतील. जिल्हा, पोलीस व महापालिका प्रशासनाने केलेल्या या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. कारण, बेळगावकरयांना येथे थांबल्यानंतर थोडासा तरी दिलासा मिळत आहे.